ख्रिस्तमस (दि. २५ डिसेंबर २०१७) शुभेच्छा
हिंदू-ख्रिश्चन जातीचा स्वाभिमान असलेला ग. ग.मधील स्वरांचा खेळिया - आदरणीय कै. गवळीसरांना विनम्र अभिवादन.
-------------------------------------------------------------------------------------
कै. मंदा येवलेकरबाई (माजी शिक्षिका- ग. ग. हायस्कूल, नाशिक)
http://gghs-nashik.blogspot.in/2017/12/blog-post.html
----------------------------------------------------------------------------
सौ. मुक्ता सरोदेबाई (माजी सुपरवायझर - ग. ग. हायस्कूल, नाशिक)
----------------------------------------------------------------------------
सौ. मुक्ता सरोदेबाई (माजी सुपरवायझर - ग. ग. हायस्कूल, नाशिक)
त्या दिवशी नेहमीप्रमाणे सायंकाळी ५:४०
वाजता शाळा सुटली. आता घरातली एक-एक कामे
समोर दिसावयास लागली. लक्षात आले, घरात
कोणतीच भाजी नाही. अगदी कांदे-बटाट्याची टोपली रिकामी झालेली
होती. मनाशी विचार केला, ‘भाजी आणावयास भद्रकाली मार्केटला जाऊं व नंतर घरी बसने जाऊं.’ आमच्या सौ. सरोदेबाई भद्रकाली मार्केटच्या भागात रहात होत्या. त्यांना मी म्हटले,”थांबा,
मीही आज तुमच्याबरोबर येते. मला भाजी घ्यावयाची आहे.”
आम्ही दोघी बोलत-बोलत भाजी मार्केटला आलो,
कोणती भाजी घ्यावी? कोणती भाजी ताजी आहे? हे पहात बाजारात
हिंडत होतो. सर्व भाजी विकणारे आपल्या आयुधांसह, भाज्या आकर्षक पद्धतीने लावून, रांगेने बसलेले होते. इतक्यात
एक भाजीवाली सरोदेबाईंकडे पाहून हसली व मोठ्याने
म्हणाली,”अग मुक्ते, तू इकडे कशी? माझी भाजी तर बघ, कशी ताजी आहे ते?” हे शब्द कानावर पडताच, आम्ही दोघी थबकलो. आम्ही त्या भाजीवालीकडून हवी ती,
भाजी खरेदी केली. त्या भाजीवालीचे अखंड बोलणे चालू होते व एकीकडे भाजी तोलण्याचे काम चालू होते. ती भाजीवाली म्हणाली, “मुक्ते, तू शिकलीस आणि मोठ्या शाळेत मास्तरीण झालीस.
आम्ही बघ ना, अश्या भाजी विकत बसलो आहोत.”
अर्थात त्या बोलण्याच्या पद्धतीत कोठेही द्वेष-मत्सर दिसत नव्हता. उलट सौ.सरोदेबाईंविषयी
कौतुकच जाणवत होते. सरोदेबाई म्हणाल्या,”अग, चालायचं. आज तुम्हीसुद्धा कामं
करुन, स्वावलंबी जीवन जगत आहात. जीवनात
श्रमाला महत्त्व आहे.” सरोदेबाईंनी मला सांगितले,” ह्या माझ्या बालमैत्रिणी आहेत. आम्ही एकत्र खेळलो,
एकत्र शिकलो”. आमच्या सरोदेबाईंना त्या बालमैत्रिणी
म्हणून ओळख करुन देताना, कोणताही कमीपणा वाटला नाही. केवढा हा मनाचा मोठेपणा !
भाजी खरेदी केल्यानंतर, चालता
-चालता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. त्या सांगू
लागल्या, “माझ्या आई - वडिलांना मी खूप
शिकाव, असे खूप वाटायचे. माझाही शिकण्याकडे
ओढा होता. अभ्यासात चांगली प्रगती
होती. मी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या तऱ्हेने
उत्तीर्ण झाले. कॉलेजला जायची जबरदस्त इच्छा होती, पण आमच्या साळी समाजात बायका शिकत नव्हत्या. मुलींची
लहानपणी लग्ने होत. मी शिकावे, असे माझ्या
वडिलांना वाटत होते. पण त्यांनी मला काही अटी घातल्या;
‘पहिली अट नऊवारी साडी, केसाचा अंबाडा,
डोक्यावर पदर, हातभर बांगड्या. अशा पोशाखातच कॉलेजला जायचे. कॉलेज व घर यापलीकडे कुठेही
जायचे नाही’. शिक्षणाची प्रचंड ओढ असल्यामुळे, मी त्यांच्या सर्व अटी मान्य करुन, कॉलेजमध्ये प्रवेश केला.
कॉलेजमधील मुले मला पाहून, ‘काकूबाई आली-काकूबाई आली’
असे जोराने ओरडत असत. मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष
दिले नाही. माझी अभ्यासातील प्रगती पाहून,
हा विरोध आपोआप नाहीसा
झाला.”
सौ.
सरोदेबाईंचे नांव ‘मुक्ता’. नाव सुद्धा त्यांच्या रहाणीला शोभून दिसत असे. शिकत असताना त्या नटणे, मुरडणे, तऱ्हेतऱ्हेच्या साड्या नेसणे, स्वच्छंदी वागणे,
ह्या सर्व प्रलोभनांपासून मुक्त होत्या. नावातली सार्थकता, त्यांनी आपल्या रहाणीतून पटवून दिली.
सौ.सरोदेबाई गोऱ्यापान, नाकीडोळी नीटस, प्रकृती उत्तम, डोळसपणे जीवनाकडे पहाण्याची दृष्टी,
स्वभावाने शांत. राग कधी त्यांच्याकडे फिरकला नाही. आम्ही शिक्षिका गमतीने म्हणत असू, “सरोदेबाईंचे केस काळे
का आहेत? ह्याचे कारण त्या कधी रागावत नाहीत. अस्वस्थ होत नाहीत.”
एकदा त्यांच्या पर्समधून ८० रुपये रस्त्यात कुठे तरी पडले, ही गोष्ट त्यांनी हंसत सांगितली. ‘सुख-दुःखे समे कृत्वा, लाभालाभो जयाजयो।‘ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र.
त्या
संस्कृत व इंग्लिश हे विषय शिकवित असत. शिकविणे उत्तम पण विद्यार्थिनींवर
कधी रागवत नसत. मुलींनी खूप दंगा केल्यावरही, त्या कोणतीच
शिक्षा करीत नसत. फक्त “अग, दंगा करु नका”, एवढेच सांगत. त्यामुळे
मुलींचा त्यांच्यावर कोणताच राग नव्हता, पण बाल-स्वभावाप्रमाणे मुली हुडपणा करीत असत. बाई रागवत नाहीत, ह्याचीही
मुलींना गंमत वाटे.
एकदा त्यांच्याबरोबर २-३ दिवस रहाण्याचा
प्रसंग आला. तेव्हा मला त्यांची खरी ओळख झाली. पूर्वी ७वी पास झाल्यावर, व्ह. फा.(व्हर्न्याकुलर फायनल) परीक्षा
असावयाची. ती परीक्षा कंडक्ट करण्यासाठी, आम्हा शिक्षकांना खेड्यात जावे लागत असे. एका वर्षी सौ.
सरोदेबाई ‘वावी’ केंद्राच्या
प्रमुख व त्यांना सहाय्य करण्यासाठी असिस्टंट म्हणून मी व आमच्याबरोबर एक शिपाई असे;
आम्ही वावीला गेलो. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे
गठ्ठे घेऊन आम्हास जावे लागायचे. मोठे जबाबदारीचे काम असावयाचे.
खेड्यामध्ये रहाण्याची तशी सोय नसायची. एखाद्या
शाळेच्या वर्ग-खोलीत आम्ही उतरत असू .चहापाणी,
नास्ता त्याच शाळेतील एखाद्या शिक्षकाकडे व्हावयाचे. सकाळी जेवण एकाकडे व रात्रीचे जेवण दुसऱ्याकडे असे ३-४ दिवस रहावे लागे.
सौ.
सरोदेबाई पूर्ण शकाहारी होत्या. परीक्षा केंद्र
खेड्यात असल्याने, लोक आम्हाला खूष करण्यासाठी भाजीचा (मटणाचा) बेत करीत. त्या लोकांची
समजूत, ‘मी भटीण पण हल्ली
शहरातले भट लोक मांसाहार करतात.” सौ. सरोदेबाई साळी समाजाच्या,
त्यामुळे काही प्रश्नच नाही. पण आम्ही दोघीही शाकाहारी
आहोत, म्हटल्यावर त्यांचा हिरमोड होत असे.
रात्र झाली की, खेड्यातील एका पुढाऱ्याचा गट आम्हाला
भेटावयास यायचा. आम्ही परीक्षा कंडक्ट करणारे म्हणून आमचा मान
मोठा ! खेड्यातील राजकारणाची माहिती गप्पांमधून कळायची. जाताना आम्हाला तो गट सांगायचा, “बाई सांभाळून, दुसरा गट तुम्हाला
आता भेटावयास येईल” पहिला गट गेल्यावर, दुसरा
गट हजर. गप्पा सुरु.
मनात विचार यावयाचा, हे लोक इतकी जवळीक
का साधतात?
सौ. सरोदेबाई प्रमुख असल्यामुळे, त्याच बोलायच्या. मी फक्त श्रोत्याचे काम करत असे.
सौ. सरोदेबाईंचे शांत व संयमी बोलणे ऐकून,
त्या लोकांची परीक्षा प्रश्नपत्रिका वगैरे संबंधी माहिती काढण्याची हिंमत होत नव्हती. ‘माणसे न दुखवता, त्यांच्याशी
संवाद कसा साधावयाचा? व कोणतीही माहिती त्यांना द्यावयाची नाही’,
ही कला सौ सरोदेबाईंकडून शिकण्यासारखी होती.
सरकारी नियमाप्रमाणे सौ. सरोदेबाईंची ट्रेनिंग
कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल म्हणून बदली झाली आणि त्यांचा
सहवास संपला. अशा ह्या शांत-
विचारी व्यक्तिमत्वाने, आमच्या मनात कायमचा ठसा
उमटविला.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक
------------------------------------------------------------------------------
आज देव दिवाळी. मंदिरात गेल्यावर देवाची शांत-प्रसन्न मूर्ति आपल्यावर कधीच रागवत नाही.
ग.
ग. ज्ञान
मंदिरातील शांत, प्रसन्न, विचारी आणि मुख्य
म्हणजे देवासारखे कधीच न रागवणाऱ्या कै.
सरोदेबाईंना देव-दिवाळी निमित्य अभिवादन
सौ. शुभांगी (श्रद्धा)जोशी - माजी
सुपरवायझर ग. ग. हायस्कूल,नासिक
त्या दिवशी
आम्ही तिघीजणी इंदिरानगर भागात काही कामानिमित्त्य गेलो होतो. बरोबर माझी मुलगी होती. काम लवकर आटोपले. आम्ही सेवानिवृत्त शिक्षिका (ग.ग.हायस्कूल,नाशिक) असल्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या बऱ्याच प्रमाणात संपल्या होत्या. आमच्याजवळ भरपूर
वेळ होता. मग टूम निघाली, आज आपण इंदिरानगर
मधील गणपती मंदिरांत जाऊ या. तिथे आजूबाजूच्या काही बायका जमवून सौ. जोशीबाई प्रवचन
करतात, असे ऐकले होते. ते प्रवचन एकदा ऐकण्याची
सर्वानाच जबरदस्त इच्छा होती. ती संधी अनायसे आज चालून आली. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर खूप प्रसन्न वाटले. मंदिराभोवतीची
बाग स्वच्छ होती. मंदिरातील श्रीगजाननाची सुबक मुर्ति आणि अशा
प्रसन्न गाभाऱ्यासमोरच्या पायऱ्यांवर आमच्या सौ
जोशीबाई दासबोधावर प्रवचन देत होत्या. दासबोधातील समास समजावून
सांगत होत्या. कठिण शब्दांचे अर्थ सांगत होत्या. समासातील आशय त्यांच्या ओघवत्या भाषेत काही उदाहरणे, उपमा देऊन स्पष्ट करत होत्या. मधूनच एखादा विनोद,
बोलण्याच्या ओघात मागील भागांवर प्रश्न विचारुन श्रोत्यांकडून उत्तरे काढून घेत होत्या. त्या ठिकाणी सर्व वयोगटांतील सर्व थरांतील महिला तल्लीन होऊन ऐकत होत्या.
जणू वर्गच भरला
होता. बाईंना प्रवचन करताना पाहिल्यावर माझ्या मनांत विचार
आला, ‘आज बाई शिक्षिका व जणू काही मी सुपरवायझर, त्यांच्या अध्यापनाचे
निरीक्षण करणे, हे माझे काम’. माझे मलाच हसू
आले. वास्तविक सौ. जोशीबाई आमच्या ग.
ग. हायस्कूलमधील सुपरवायझर. आमच्या ह्या सुपरवायझर बाई बारीक नजरेने आम्हा शिक्षकांच्या अध्यापनावर लक्ष ठेवून, सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचे निरीक्षण करत, सर्व शाळाभर हिंडत असत. विद्यार्थिनींच्या
हसण्या-खिदळण्यावर गप्पागोष्टींवर त्यांची बारीक नजर असे.
शाळेची शिस्त राखण्यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करीत. माझी मुलगी त्यांची विद्यार्थिनी असल्यामुळे, आपल्या
आवडत्या बाईंचे विषयाशी एकरुप होऊन शिकविणे, तिने रेकॉर्ड केले.
बाईंचे व त्यांच्या विद्यार्थिनीनींचे फोटो कॅमेराबद्ध झाले.
दिवस खरोखच सत्कारणी लागला.
हा सर्व कार्यक्रम
चालू असताना, माझ्या डोळ्यासमोर शाळेच्या व्हरांड्यात हिंडणाऱ्या
तरुण जोशीबाई उभ्या राहिल्या. बेताची उंची, मजबूत बांधा, गव्हाळ रंग, व्यवस्थित
नेसलेली साडी, पांढरे शुभ्र सुंदर दात, केस लांब असल्यामुळे पाठीवर लांबसडक २ वेण्या, चालणे
रुबाबात, निरिक्षण करणारे बोलके डोळे, बोलणे
थोडे कडक, त्यास
शिस्तीचा वास
येत असे. शिकविणे उत्तम, अक्षर सुरेख, पेपर तपासणे पद्धतशीर. पेपर तपासताना ‘कुठे चुकले?’ ह्यावर
लाल साई; काय लिहावयास हवे? ह्याचा समासात
उल्लेख. चुका त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत. बोलणे मार्मिक, त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनात आदरयुक्त
भावना होती. कोणाचीही नक्कल त्या हुबेहुब करत असत.
शिक्षणक्षेत्रात
त्यांनी क्लार्क म्हणून प्रवेश केला. त्यांना टायपिंग व व्यवस्थापनाची
पूर्ण माहिती होती. शासनाने पाठविलेले G.R. त्यांचे अर्थ, सरकारी हुकूमनाम्यास द्यावयाची उत्तरे,
त्याची पद्धत वगैरेंची त्यांना माहिती होती. सेवाकाल चालू
असताना, त्यांनी आपली गुणवत्ता B.A.वाढविली.
आमच्या शासकिय माध्यमिक
कन्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. M.A.M.Ed. झाल्या. शैक्षणिक प्रगती फर्स्टक्लास करणाऱ्या सौ.जोशीबाई अनुभवसंपन्न असल्यामुळे सुपरवायझर पदावर काम करु लागल्या.’Self-made
person’ म्हणून त्या उत्तम उदाहरण
आहे. आमच्या सरकारी शाळेत बऱ्याच वेळा मुख्याध्यापिकेचे पद रिकामे रहात असे. शासनाच्या काही अडचणी असतील, कारण मला माहित नाही.
सौ. जोशीबाईंवर एवढी मोठी शाळा व तिचे व्यवस्थापन
ही जबाबदारी असायची. त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
S.S.C. &
H.S.C.च्या परिक्षेच्यावेळी त्या कंडक्टर असत. त्यांचा सगळीकडे मुक्त वावर होता. दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी
त्यांना घाबरत, पण परिक्षा सुरळीत व शांतपणे पार पडत.
त्यांची वागणूक फणसाप्रमाणे होती. ‘वरुन कांटे
असले तरी गाभा फार गोड असतो.’ त्या मनाने फार चांगल्या आहेत. कोणाचीही कोणतीही अडचण
असली तर त्या वेळप्रसंगी धावून
जातात, त्या व्यक्तीस धीर देतात.
काळाप्रमाणे
त्यांच्या रहाणीत व विचारसरणीत बदल झाला. केस मानेवर बो बांधून
ठेवलेले दिसू लागले. तऱ्हेतऱ्हेचे अनुभव मिळाल्यामुळे, बोलणे चालण्यात
बद्दल जाणवू लागला. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजदेरकर बाई एकदा
त्यांना म्हणाल्या होत्या, “जोशीबाई सर्व गोष्टी शिकून घ्या.
ही शाळा तुम्हाला चालवायची आहे” त्यांचे शब्द खरे ठरले. बरेच वेळा शाळेच्या मुख्याध्यापिकांची
जबाबदारी जोशीबाईंना सांभाळावी लागली, त्यांनी ती समर्थपणे
पार पाडली.
सौ.जोशीबाईंमध्ये सर्व दृष्टीने योग्य कार्यक्षमता असताना,
त्या मुख्याध्यापिका
पदावरुन सेवानिवृत्त का झाल्या नाहीत? ह्याची माझ्या मनाला
नेहमी खंत वाटते. पण सौ. जोशीबाई ह्या बाबत
कधीच काही बोलल्या नाहीत. ‘आपण बरे की आपले काम बरे!’
सेवानिवृत्त
झाल्यावरही त्यांच्यातील शिक्षक नेहमी जागा असतो. प्रवचन देणे,
समाजात ज्ञानाचा प्रसार करणे, समाजात विशेषतः महिलांना
प्राचीन ग्रंथांची ओळख करुन देणे, त्यातील आशय समजावून सांगणे
असे त्यांचे समाजकार्य चालू असते.
वेळ :-
४॥ ते ५॥ स्थळ :-श्रीगणपती मंदिर इंदिरानगर.
सुट्टी कधीही नाही, हे त्यांच्या कार्याचे स्वरुप.
‘ज्ञानदान करणाऱ्या सेवाव्रती सौ. जोशीबाईंचे कार्य अखंडपणे
चालू राहो,’ हीच सदिच्छा
श्रीमती प्रभा
आठवले
माजी शिक्षिका, ग. ग. हायस्कूल नाशिक
--------------------------------------------------------------------------------
मा. वसुमती देशपांडेबाई
(माजी सुपरवायझर, ग. ग. हायस्कूल, नाशिक)
सकाळची
वेळ होती, ते परीक्षेचे दिवस होते. बस शाळेच्या
मुलींनी भरलेली होती. मेहेर बसस्टॉपवर बस थांबणार होती. त्या आधीच गलका झाला. “मुलगी पडली!
मुलगी पडली!” बसचा ब्रेक कचकन लागला नि बस थांबली.
त्या बसमध्ये मीही होते. ‘मुलगी पडली कशी काय पडली?’
मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. लगेच उत्तर मिळाले, स्टॉपपाशी बस येताना बसचा वेग हळू
होतो. बालवयात सगळीच घाई, बस थांबण्याआधी आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीने बसमधून उडी मारली. तिच्या पायाचे हाड मोडले. ड्रायव्हर- कंडक्टर घाबरुन गेले; पण मी त्यांना सांगितले,
“घाबरु नका. आपण हिला सिव्हिल हॉस्पिटलला अॅडमिट
करु.” मी शाळेत निरोप पाठवला. ‘अपघात झालेला
आहे व ह्या मुलीला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जात आहे. उशीर होईल.’
बाकीच्या मुली शाळेत गेल्या. माझ्या मुलीला व तिच्या
मैत्रिणीला तिच्या पालकांना निरोप देण्यासाठी त्या विद्यार्थिनीच्या घरी पाठवले.
अपघाताची
केस असल्यामुळे पोलीस हॉस्पिटलमध्ये आले. ती मुलगी शुद्धीत असल्यामुळे
पोलिसांनी तिची जबानी घेतली. बालस्वभावाप्रमाणे त्या मुलीने खरे होते तेच सांगितले, “मी बस चालू असताना उडी मारली म्हणून पडले.” पोलिसांनी
लेखी जबानी घेतली ते निघून गेले. ड्रायव्हर-कंटक्टर माझे तीन तीनदा आभार
मानत होते. मी म्हटले, “आभार कसले मानता! मी माझे काम
केले.”
थोड्या वेळानी
त्या मुलीचे पालक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व माझ्यावरच ओरडायला लागले. आभार मानायचे तर बाजूलाच राहिले. मला म्हणायला लागले, “तुम्ही तिला रस्त्यावर पडू द्यायची.
हॉस्पिटलला अॅडमिट का केले?” त्यांची ही भाषा ऐकून
मी हतबुद्ध झाले. नंतर कळाले की, त्यांना
S.T. च्या ड्रायव्हर-कंटक्टरला दोषी ठरवून S.T.कडून नुकसान भरपाई
मागायची होती. प्रत्यक्ष जन्मदात्याची ही भूमिका पाहून मी थक्क झाले.
पुढे
काय चक्र फिरली, मला माहिती नाही. दोन पोलिस ८-१५ दिवसांनी शाळेत
येत व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहिलेल्या कागदावर मला सही करा म्हणून पाठीमागे लागत.
मी त्यांना स्पष्ट सांगितले, “जे घडले तेच मी लिहिणार
व सही करणार.” पण ते पोलीस ऐकेनात. महिना-पंधरा दिवसांनी पोलिस आले की, मुलींची कुजबुज सुरु होई. ‘आठवलेबाईंकडे पोलिस आले!
आठवलेबाईंकडे पोलिस का येतात?’ त्या बालमनांना
ही गोष्ट खटकत असे.
मी
ऐकत नव्हते, पोलिस माझा पिच्छा सोडत नव्हते. एकदा मी जरा वैतागलेच त्या पोलिसांना म्हटले की, “तुम्ही
आमच्या मुख्याध्यापिकाबाईंना
भेटा, मग काय ते आपण
ठरवू.”
ते
दोन पोलिस व मी अशी आमची वरात मुख्याध्यापिकाबाईंच्या
ऑफिसमध्ये गेली. त्यावेळी मुख्याध्यापिका म्हणून आमच्या सुपरवायझर देशपांडेबाई काम पहात
होत्या. माझे म्हणणे बाईंनी शांतपणे ऐकून घेतले.
आमच्या देशपांडेबाई त्या पोलिसांना म्हणाल्या, “माझ्या परवानगीशिवाय माझ्या शाळेत कोणी यावयाचे नाही. माझ्या शिक्षकांना कोणीही भेटायचे
नाही. यापुढे मला जर काही कळले तर मी लेखी तक्रार पोलिस
कमिशनर साहेबांकडे करीन.” बाईंचे ते कणखर शब्द ऐकताच,
ते पोलिस खाली मान घालून निघून गेले.
देशपांडेबाईंचे ते रुप पाहून माझ्या मनात विचार आला, एखादा कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातील घटकांचे सर्वतोपरी संरक्षण करतो.
तसेच शाळा हे एक कुटुंब त्याची प्रमुख मी सर्वतोपरी संरक्षण करणे,
हे माझे कर्तव्य.’ ही बाईंची उदात्त भावना, त्या भावनेपुढे माझी मान आदराने नतमस्तक झाली.
देशपांडेबाईंची वर्तणूक त्यांच्या धीर गंभीर आवाजात, चालीत प्रामुख्याने जाणवायची. उंच व शिडशिडीत
बांधा, व्यवस्थित पोशाख. दोन्ही खांद्यावर लपेटून
घेतलेला पदर, रहाणी साधी, चेहरा गंभीर जणू सर्व काही
जबाबदाऱ्या त्यांनाच सांभाळायच्या आहेत. चालणे
रुबाबात-शिकविणे उत्तम. मुलींच्या मनात
आदरयुक्त धाक. शाळेतील समस्या संयमाने
सोडविण्याकडे त्यांचा कल असावयाचा.
एकदा
काय झाले, एका मुलीने एका शिक्षिकेच्या
पर्समधले पैश्याचे पाकिट चोरले. ती शिक्षिका पटांगणात पर्स ठेवून, मुलींचे खेळ घेत होती.
त्या मुलीने पैश्याचे पाकिट चोरताना दुसऱ्या मुलीने पाहिले. तिने हळूच आपल्या बाईंच्या कानात सांगितले. खेळ थांबला,
त्या मुलीला मुख्याध्यापिकांच्या
ऑफिसमध्ये नेण्यात आले. सौ. देशपांडेबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पहात होत्या. वर्गशिक्षिका म्हणून मी, पैसे चोरीला गेले म्हणून त्या संबंधित बाई, ती मुलगी, एक शिक्षक व एक
शिपाई असे सर्व ऑफिसमध्ये गेलो. बाईंना सर्व घटना सांगितली. बाई त्या मुलीला शांतपणे
म्हणाल्या, “खरे काय ते सांग.” पण ती मुलगी
फक्त म्हणत होती, “मी पैसे घेतले नाही.” काही केल्या कबूल होईना. मुलगी कशास दाद देईना. शेवटी तिच्या पालकांना बोलाविण्यासाठी,
शिपाई घरी पाठवला.
पालकांनी उत्तर दिले, “तुम्ही काय करायचे
ते करा. मला सांगू नका. वाटल्यास पोलिसच्या
ताब्यात द्या.” पालक काही येईनात. मुलगी
कबूल करेना. ५:४० ला शाळा सुटली. रात्र झाली, अंधार झाला.
‘शाळेच्या समस्या
शाळेतच सोडवायच्या’, ही देशपांडेबाईंची विचारसरणी. रात्रीचे नऊ वाजले. इतक्यात कोणाचे लक्ष नाही,
असे पाहून त्या मुलीने लपविलेले पाकिट जमिनीवर टाकले. त्या शिक्षिकेला तिचे पैसे परत मिळाले. प्रश्न सुटला.
त्या मुलीला बाई म्हणाल्या, “यापुढे अशी चूक होता
कामा नये. चूक केलीस तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील.” त्यानंतर आम्ही
घरी गेलो.
शांत व
धीरगंभीर देशपांडेबाईंचा सहवास, आम्हाला त्यांची प्रमोशनवर औरंगाबादला मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक होईपर्यंत मिळाला. नाशिकला सुट्टीत आल्या की, आम्हाला शाळेत भेटावयास येत असत. नंतरच्या काळात
आपल्या कुशल कार्य कर्तृत्वाने त्या उपशिक्षणाधिकारी होऊन शासकिय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या.
श्रीमती प्रभा आठवले
माजी शिक्षिका- ग. ग.
हायस्कूल, नाशिक.
सौ. विमल (वसुमती) मानेबाई (माजी सुपरवायझर - ग. ग. हायस्कूल, नाशिक)
पहाटे ५-५॥ ची वेळ होती. आमच्या
शाळेची मुलींची सहल सापुताऱ्यास चालली होती. सहलप्रमुख सौ.
मानेबाई; त्यांच्या मदतीस आम्ही ३ शिक्षिका व १
शिपाई असे मुलींसोबत चाललो होतो. बसमध्ये मुलींच्या भेंड्या, गाणी, गप्पा, मोठ्याने बोलणे
- हसणे अशी मजेत दंगा-मस्ती सुरु होती.
सहलीचा आनंद मुक्तपणे लुटणे चालू होते. आता त्यांच्यावर शाळेतील कोणतीच बंधने नव्हती. इतक्यात ड्रायव्हरने बसला अचानक ब्रेक लावला.
बस थांबली. मुली किंचाळायला लागल्या.
‘काय झाले?’ एकच प्रश्नचिन्ह उभे राहिले. समोरचे दृश्य पाहून, आम्ही
हादरलोच. आमच्या सौ.
मानेबाईंनी “चूप” असे मोठ्याने
म्हटले. मुली एकदम शांत. मानेबाई पर्स घेऊन,
बसमधून रस्त्यावर उतरल्या. आम्ही शिक्षिका व शिपाई खाली उतरलो. भयंकर दृश्य
समोर उभे होते. ७-८
दांडगी-राकट माणसे, काठ्या व कुऱ्हाडींसह
बससमोर उभी होती. रस्ता मोठ्या दगडांनी व काट्यांनी
अडविलेला होता. आमच्या मानेबाई हाताची घडी घालून त्या लोकांसमोर
उभ्या राहिल्या. शांत स्वरांत
न घाबरता त्या लोकांना म्हणाल्या, “बाबांनो, तुम्हाला
काय हवे? आम्ही मुलींना घेऊन सहलीला चाललो आहोत. आमच्या जवळ फक्त जेवणाचे डबे आहेत.”
आमच्या मानेबाईंचा शांत, धीरगंभीर आवाज ऐकून, ते वाटमारी करणारे लोक वरमले. त्यांचा म्होरक्या म्हणाला, “बाई, आम्हाला फक्त १ रुपया द्या. काही न मिळवता रिकाम्या हाताने
परत जाणे, आमच्या धंद्याच्या नियमांत बसत नाही.” सौ. मानेबाईंनी त्यांना एक
रुपया दिला व आमचा मार्ग मोकळा झाला. काही व्यक्ती आपल्या सात्विक
आचार-विचारांतून संकटाला तोंड देतात. त्याचे
उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मानेबाई.
मानेबाई
आमच्या मुख्याध्यापिका सौ. राजदेरकरबाईंचा
उजवा हात. मोठ्याबाईंचे (सौ राजदेरकरबाईंचे)
मुलींवर संस्कार करण्यासाठी विविध प्रयोग चालत. त्यांना साथ होती, मानेबाईंची.
आम्हा शिक्षिकांमध्ये त्या मिळून-मिसळून वावरत असत. आपल्या मृदुवाणीनी
त्यांनी विद्यार्थिनी व शिक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या
वाणीत मृदुता तर होतीच पण थोडी जरबही जाणवायची. त्यामुळे त्यांनी
सांगितलेले काम केलेच जायचे. त्यांनी आम्हा शिक्षकांना बोलावले
तर ‘आम्ही पळत त्यांच्यासमोर हजर रहावे’ ही त्यांची अपेक्षा. ‘प्रत्येक व्यक्तीने चपळ राहिले
पाहिजे’, हा त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन.
सावळा
रंग, बोलके डोळे, उंचीला योग्य असा बांधा, टापटिपीने नेसलेली व्यवस्थित साडी व योग्य ब्लाऊज, किंचित
कुरळे केस. केसाचे चक्कर घातलेले व खांद्यावर पर्स अशा थाटात
मानेबाईंचा शाळेत सर्वत्र वावर असे. कारण त्या शाळेच्या सुपरवायझर
होत्या ना ! शाळेतील वातावरण प्रसन्न व शिस्तित राखण्यावर त्यांचा
कटाक्ष होता. शाळेचे व्यवस्थापन
पहात असल्या तरी त्यांना अध्यापनाचे काम करावे लागायचे. त्या जन्मजात शिक्षक असल्यामुळे, आपले काम चोख करीत असत.
शासकीय
नियमाप्रमाणे त्यांची बदली झाल्याने त्यांना आमचा
निरोप घ्यावा लागला. आमच्या शाळेशी असलेला त्यांचा संबंध तुटला; तरी त्यांनी आमच्याशी
जोडलेले जिव्हाळ्याचे संबंध अखंड जपले.
श्रीमती प्रभा आठवले
(माजी शिक्षिका – ग. ग. हायस्कूल, नाशिक)
-------------------------------------------------------------------------------
बाईंचे शिकवणे खूप तळमळीने असायचे. मुलींवर चांगले संस्कार होण्यासाठी सतत दक्ष असायच्या
ReplyDeleteधन्यवाद
Delete