‘सेवानिवृत्त
शिक्षिका’ ह्या नात्यातून मला
जाणविते, ती ग. ग.च्या विद्यार्थिनींची माझ्या मनावरील सत्ता! वास्तविक
शालेय जीवनात शाळेचे सत्ता केंद्र मुख्याध्यापिका बाई. एखाद्या
जहाजाच्या कप्तानाप्रमाणे, शाळेला योग्य दिशा देण्याचे कार्य
करणारा मुख्याध्यापिका हा अधिकारी वर्ग; ग. ग. शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत असताना अनुभविण्यास
मिळाला.
माननीय
सरिता उजागरेबाई सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या पदावर महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ
प्रसिद्ध लेखिका सौ. भावना भार्गवेबाई रुजू झाल्या. त्यांनी शाळेतील पहिले उपक्रम तसेच चालू ठेवत, स्वतःच्या
कल्पना विविध माध्यमांतून साकारण्याचा प्रयत्न केला. स्वतः प्रतिभासंपन्न
लेखिका असल्यामुळे, त्यांनी ग. ग.
तील वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दर महिन्याच्या अखेरीस ४ शिक्षकांनी एखादे नावाजलेले पुस्तक सखोल अभ्यास करुन,
त्यावर परिसंवाद सादर करायचा. ह्या उपक्रमातून
विद्यार्थिनीना नवीन पुस्तकांची माहिती मिळू लागली तसेच सर्वांमध्ये वाचनाची गोडी निर्माण
होण्यास सुरवात झाली. शाळेत शारदोत्सव सुरु झाला.
विविध क्षेत्रातील
तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने ग. ग. आयोजित होऊ लागली. सेंट्रल हॉलमध्ये टी. व्ही. वरील बातम्यांसारखे दैनंदिन घडामोडींवरील बातमीपत्र
सादर होऊ लागले. आम्हा शिक्षकांना पुढील आठवड्यांत शिकविण्याचे
टाइम टेबल मोठ्याबाईंपुढे सादर करावे लागे. अशी ग. ग. तील नियोजनबद्ध शिक्षण-व्यवस्था
निर्माण करणाऱ्या भार्गवेबाई सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या जागी
अत्यंत शांत स्वभावाच्या मोरेबाई विराजमान झाल्या. ग.
ग. तील सर्व शिक्षक व कर्मचारी व्यवस्थित काम करीत
आहेत; हे लक्षात आल्यामुळे असेल, त्यांनी कोणालाही कसलीच आडकाठी केली नाही. आत्तापर्यंत
कडक शिस्तीत तयार झालेला शिक्षक तसेच कर्मचारी वृन्द, सैनिकी
शिस्तीत काम करीत होता. शांत स्वभावाच्या आदरणीय मोरेबाई सतत
विचारमग्न दिसायच्या. मोठ्याबाईंच्या वैयक्तिक-घरगुती काही अडचणी असाव्यात, असे आम्हाला सतत वाटायचे.
त्यामुळेच सेवानिवृत्त
झाल्यावर मोरेबाईंनी लगेच इहलोकाचा निरोप घेतला, असे मला समजले. कारण मोरेबाईंच्या काळात मी सेवानिवृत्त
झाले. आमच्या ग. ग. कुटुंबानी मला दिलेला निरोप समारंभ चिरस्मरणात राहील, असा होता.
माझ्या ग.
ग. शाळेतील सेवाकाळात, मला
सहकाऱ्यांकडून-विद्यार्थिनींकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
आमच्या शाळेच्या १०० वर्षे जुन्या इंग्लिश पुस्तकांच्या लायब्ररीचा चार्ज
माझ्याकडे होता. अध्यापनाबरोबर ग्रंथपाल
कामाचा अनुभव मला मिळाला. ह्या लायब्ररीत खूप जुनी, दुर्मिळ पुस्तकांचा अनमोल ठेवा होता. काही वेळा मुली वर्गात
फावल्या वेळात शिवा-शिवी खेळायच्या. कपाटाच्या
काचा फुटायच्या. ह्या कपाटातील पुस्तके सांभाळणे, त्यांच्या नोंदी ठेवणे म्हणजे मोठे जिकीरीचे काम. ह्या
नोंदी खूप व्यवस्थित ठेवल्यामुळे, सेवानिवृत्तिपूर्वी चार्ज देताना,
मला काहीच त्रास झाला नाही की पदरचे पैसे भरावे लागले नाहीत.
अंगावर पडलेले काम चोख केल्याने माझे
C.R. कधीच खराब झाला नाही.
आमची ग.
ग. शाळा हे एक कुटुंब होते. कुटुंब म्हटले की, भांड्याला भांडे वाजणारच. काहीवेळा कळत-न कळत मान-अपमान व्हायचे.
शक्यतो संघर्ष येऊ द्यावयाचा नाही, टोकाची भूमिका
घ्यायची नाही, ही मनाला शिकवण असल्यामुळे संघर्षाचे स्वरुप सौम्य
व्हायचे. शाळेतील स्पर्धा, खेळ,
स्नेहसंमेलन वगैरेतून आम्ही सर्वजण अमर्याद आनंद मिळवायचो.
शिक्षकी
पेशातील कठोर शिक्षा म्हणजे पेपर तपासणे, निकाल लावणे.
काही मुली अभ्यास करायच्या नाहीत, वह्या नीट ठेवीत नसत, अक्षर गचाळ वगैरे गोष्टी पाहिल्यावर; खूप वैताग यायचा.
कधी-कधी नैराश्यातून राजीनामा देऊन बाहेर पडावे,
असा विचारही मनात यायचा.
मला स्वतःला
शिक्षकी पेशाची आवड नव्हती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात,
माझ्या शालेय जीवनात, माहेरी बुलढाण्याला आम्ही केसरी पेपर वाचायचो. त्याकाळात
आमच्या गावी एक दिवस उशिरा पेपर पोहोचायच्या. केसरीतील द.
वि. ताम्हनकर, लंडन ह्यांचकडून
हे सदर, मी खूप आवडीने वाचायची. त्या वयात त्या सदरातील मजकुराचे गांभीर्य मला कळत नव्हते. अक्षर-ओळख असल्यामुळे,
मला वाचता येत होते. लंडनहून द. वि. ताम्हनकर बातम्या पाठवितात; ह्या गोष्टीचे मला आकर्षण
होते. माझे स्वप्न होते, ताम्हनकरांसारखेच
आपणही पत्रकार व्हायचे. जीवनात पत्रकार मी बनू शकले नाही.
आमच्या ग. ग. ची माजी विद्यार्थिनी डॉक्टर वृन्दा भार्गवे (उप-प्राचार्या) एच. पी.टी कॉलेजमधील वृत्तपत्र विभागातील शिक्षणाद्वारे समाजातील भावी पत्रकार समर्थपणे
बनवून, मला खूप आनंद देत आहे.
आज प्रसार माध्यमांद्वारे
ग. ग. तील आमच्या विद्यार्थिनी सौ.
माधुरी गयावळ (सुमंत) तसेच
वैजयंती सिन्नरकर ह्यांच्या अप्रतिम कविता खूप समाधान देतात. ह्या कविता वाचताना आठवते ती, कुसुमाग्रजांची मानस-कन्या रेखा भंडारे. महाराष्ट्रातील प्रतिथयश कवयित्री
असलेली रेखा भंडारे, शाळेत असताना मोठ्या उत्साहात, मधल्या सुट्टीत, व्हरांड्यात मला गाठून तिच्या स्वतःच्या
रचना दाखवायची. आजही ती आमची चिमुकली कवयित्री
रेखा भंडारे डोळ्यासमोर उभी रहाते.
सौ चित्रा देशपांडे
(दर्भे) ही आमच्या शाळेची निगर्वी विद्यार्थिनी.
‘आकार’ ह्या स्वतःच्या संस्थेद्वारे, चित्रा पुण्यातील बाल-कलाकारांना संगीताच्या क्षेत्रात
घडवित आहे. कधीही भेटली तर तिचे उपक्रम ती मोठ्या उत्साहात सांगत
असते.
आमच्या शाळेतील
विद्यार्थीनींनी राजकारण, वकील, डॉक्टर,
नर्स, इंजिनिअर,
चित्रकार, शासकिय अधिकारी, सी. ए., अभिनय, उद्योजक, किर्तनकार, गायिका, लेखिका अशा विविध क्षेत्रात यश मिळविले आहे.
आज इतक्या वर्षांनी त्या भेटल्यावर, मधली वर्षे
गळून पडतात. जीवनात आत्मविश्वासपूर्ण उभ्या राहिलेल्या आमच्या
ग. ग.च्या मुली पाहिल्यावर, शिक्षकी-पेशाचा अभिमान वाटतो.
आजच्या संगणक
युगात, शिक्षण-क्षेत्राला आलेली पठारावस्था; संपून उद्याची प्रजा घडविणाऱ्या प्रजा-सत्ताकाची
पहाट लवकर उजाडावी, ह्याच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
प्रभा आठवले
माजी शिक्षिका,
ग. ग. हायस्कूल, नाशिक